दयाबेन परत आली तर ठिक, नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नाही


सब टीव्ही सर्वात लोकप्रिय असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे काहीकाळ बंद होती. पण आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यातच या मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेली दयाबेन मालिकेत पुन्हा कधी परतणार? हा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत.

गरोदरपणामुळे मालिकेतून ब्रेक घेणारी अभिनेत्री दिशा वकानी अडीच वर्षानंतरही मालिकेत परतलेली नाही. आजच ‘तारक मेहता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने निर्माता असित मोदी यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत दयाबेन या व्यक्तिरेखेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मालिकेत दिशा वकानी पुन्हा आली तर ठिक नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘तारक मेहता’ मालिकेतील दया बेन ही मुख्य व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेभोवती मालिकेतील अनेक प्रसंग फिरताना आपण पाहिले आहेत. शिवाय आपल्या अनोख्या अभिनय शैलीतून या भूमिकेला दिशाने प्रचंड लोकप्रिय केले. पण मालिकेत दयाबेनला पुन्हा कधी पाहायला मिळणार? याबाबत असित मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दिशाला मालिकेत परत येण्यासाठी आम्ही अनेकदा विनंती केली. पण तिने अद्याप त्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मालिकेत दिशा वकानी पुन्हा आली तर ठिक नाहीतर तिच्यावाचून आमचे काही अडत नाही. दया बेन नसतानाही गेल्या अडीच वर्षांपासून मालिका सुरु आहे. पण मालिकेच्या टीआरपीवर काहीही परिणाम झालेला नाही. प्रेक्षक आमच्यावर आजही तितकेच भरभरुन प्रेम करत आहेत. एका व्यक्तीमुळे नव्हे तर संपूर्ण टीममुळे कुठलीही मालिका चालते. आमची टीम खूप चांगले काम करत आहे. गेल्या अडीच वर्षात दिशा वकानीची कमतरता आम्हाला बिलकूल भासलेली नाही.