लाल किल्ल्याखाली इंदिरा गांधींनीही ठेवली होती टाईम कॅप्सूल


नवी दिल्ली – लवकरच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात होणार असून, येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. अयोध्येत त्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान, मंदिर निर्माणासंदर्भातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली होती. मंदिर निर्माण करत असताना मंदिराच्या २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’देखील ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पण देशात काही महत्त्वाच्या ठिकाणी यापूर्वीही जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली होती. जमिनीच्या ३२ फूट खाली लाल किल्ल्यातही एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे. ही टाईम कॅप्सूल १९७३ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ठेवण्यात आलेली होती. त्या काळातील महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रे आणि इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्यांना उत्खननानंतर माहिती व्हावी हा त्यामागील हेतू असतो.

१५ ऑगस्ट १९७३ रोजी इंदिरा गांधी यांनी लालकिल्ल्यात जमिनीच्या ३२ फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवली होती. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांच्या घटना पुराव्यांसह यामध्ये ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन काऊंन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चला मागील काळातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याचे काम इंदिरा गांधी यांनी सोपवले होते. परंतु त्यावेळी सरकारच्या या निर्णयावरून मोठा वादही झाला होता.

विरोधकांनी त्यावेळी इंदिरा गांधी यांनी स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा गुणगौरव केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ही टाईम कॅप्सूल काढून त्यात कोणत्या गोष्टींची नोंद आहे हे पाहणार असल्याचे मोरारजी देसाई यांनी म्हटले होते. तसेच मोरारजी देसाई यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी ती टाईम कॅप्सूल काढलीही होती. परंतु त्यात कसली नोंद करण्यात आली होती, याचे रहस्य आजही कायम आहे.

टाईम कॅप्सूल मागे नेमका काय उद्देश असतो ?
मागील काळात काय घडले याची माहिती आगामी पीढीला व्हावी हा टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवण्यामागील मुख्य उद्देश असतो. केवळ लाल किल्ल्यातच नाही तर देशातील अशा अनेक ठिकाणी जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आल्या आहेत. टाईम कॅप्सूलद्वारे जमिनीखाली आयआयटी कानपूरच्या ५० वर्षांच्या इतिहासाची माहितीदेखील ठेवण्यात आली आहे.

ही टाईम कॅप्सूल तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी जमिनीखाली ठेवली होती. या टाईम कॅप्सूलमध्ये आयआयटी कानपूरचे संशोधन आणि शिक्षकांशी निगडीत माहिती ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती अशाचप्रकारे टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे. टाईम कॅप्सूलच्या मागे मोठा इतिहास असून केवळ भारतातच ही संकल्पना नाही. स्पेनमध्ये ४०० वर्ष जुनी टाईम कॅप्सूल ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सापडली होती. काही कागदपत्रे एक मूर्तीच्या आत ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १७७७ च्या आसपासचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबतची माहिती होती.