कोरोनाच्या संकटकाळात ८० लाख भारतीयांनी पीएफ खात्यातून काढले ३० हजार कोटी


नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटकाळात ८० लाख भारतीय कर्मचाऱ्यांनी आपल्या EPFO अर्थात भविष्य निर्वाह निधीतून तब्बल ३० हजार कोटी रुपये काढले असून हा निधी एप्रिल ते जुलै या महिन्यांच्या कालावधीत काढण्यात आला आहे. ८० लाख भारतीयांनी त्यांच्या पीएफ अकाऊंटमधून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ३० हजार कोटी रुपये काढल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

या आधी आलेल्या वृत्तानुसार २० लाख कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पीएफ खात्यातून ९ जून ते २९ जून या २० दिवसांच्या कालावधीमध्ये पैसे काढले आहेत. यावरुन सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही देशातील कामगार वर्गाला किती मोठा आर्थिक फटका बसला आहे याचा अंदाज बांधता येतो. देशातील कामगार वर्गाला लॉकडाउनच्या काळात पगार कपातीचाही सामना करावा लागला. तसेच काहींना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३० हजार कोटी हे पीएफ खात्यातून काढण्यावर लोकांनी भर दिल्याचे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.