एक ऑगस्टपासून नवीन कार किंवा टू-व्हिलर खरेदी करताना होणार पैशांची बचत


नवी दिल्ली – एक ऑगस्टपासून नवीन कार किंवा टू-व्हिलर खरेदी करताना पैशांची बचत होणार आहे. कारण, विमा कंपन्यांना ‘लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ न विकण्याचे आदेश भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) दिले आहेत. म्हणजेच गाडी खरेदी करतेवेळी नवीन वाहन धारकांना ‘लाँग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ घेणे बंधनकारक नसणार आहे. याचा वाहनांच्या ऑन रोड किंमतीवर थेट परिणाम होणार असल्यामुळे वाहने स्वस्त होतील.

एक ऑगस्टनंतर ऑटो इन्शुरन्ससाठी इरडाच्या आदेशामुळे जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कार आणि टू-व्हिलरच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक ऑगस्टपासून बदल होणार आहेत. इन्शुरन्स कंपन्यांना जून महिन्यात लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज न विकण्याचे आदेश इरडाने दिले होते. त्याची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याअंतर्गत तीन किंवा पाच वर्षासाठी मोटर वाहन वीमा अनिवार्य करण्याचा नियम संपुष्टात आला आहे.

इन्शुरन्स कंपन्यांसाठी हा नवीन आदेश जून महिन्यात इरडाने जारी केला होता. यापूर्वी लाँग टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा नियम 2018 च्या ऑगस्टमध्ये लागू झाला होता. याअंतर्गत नवीन कार खरेदीवर 3 वर्षाची पॉलिसी आणि सप्टेंबर 2018 पासून दुचाकीसाठी 5 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी घेणे बंधकारक झाले होते. पण आता इरडाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर वाहनांसाठी लाँग टर्म पॉलिसी बंधनकारक नसेल असे स्पष्ट केल्यामुळे आता विमा कंपन्यांना केवळ 1 वर्ष ऑन डॅमेज पॉलिसीचीच विक्री करता येणार आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार असून त्यांच्या पैशांची बचत होणार आहे.