पाणीसाठा कमी असल्याने पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार


पुणे : पुणेकरांवर यावर्षी देखील पाणीकपातीचे संकट कायम असणार आहे. मागील वर्षांपेक्षा 6.88 टीएमसी पाणीसाठा खडकवासला धरण प्रकल्पात कमी असल्याने हे पाणीकपातीचे संकट पुणेकरांवर आले आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धरण प्रकल्पातील चारही धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने 12 दिवसांमध्ये धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पण हा पाणीसाठा मागीलवर्षीच्या तुलनेत कमीच आहे.

असे असले तरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्यास टळू शकते. खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. तर शेतीसाठी दौंड, इंदापूर आणि बारामतीला पाणीपुरवठा होतो. पण पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पाणी कमी असल्यामुळे खरीप हंगामासाठी या पाणी प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडता आले नाही.

4 धरणांमध्ये गेल्यावर्षी एकूण 16.74 टीएमसी म्हणजेच 57.43 टक्के पाणीसाठा होता. सद्य परिस्थितीत चारही धरणातील पाणीसाठा 9.86 टीएमसी म्हणजेच 33.82 टक्के आहे. खडकवासला 41.01 टक्के, पानशेत 39.95 टक्के, वरसगाव 31.77 टक्के, टेमघरमध्ये 19.44 टक्के पाणीसाठा असल्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट कायम आहे. पण ऑगस्टमध्ये किती पाऊस होतो यावरच हा निर्णय ठरणार आहे.