प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन न वाढवण्याची विनंती


मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही खुदा होऊ नका, अशी विनंती करत लॉकडाऊन न वाढवण्याची मागणीही केली. भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे कोरोनाने नाही, पण रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीने माणसे मरतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आपण कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणू, असे ‘सामना’ला दिलेल्या अनलॉक मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘उद्धव ठाकरे, विनंती… खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. त्यावेळेस मीही भ्यायलो होतो. अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीने 40 टक्के लोकबाधित होतील, असे सांगितले. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितले की भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. आता ऑस्ट्रेलिया जिंकत असल्याचे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आज कोरोना मृत्यूदर दोन टक्के किंवा त्याच्या थोडा वर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसे जन्माला आली, की त्यांचे मरण निश्चित असल्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावे. तरच माणसे जगतील, नाहीतर उपासमारीने माणसे मरतील अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, आपण लॉकडाऊन वाढवू नका.