मोदींचे आवाहन; जवानांचे शौर्य जाणून घेण्यासाठी एकदा तरी ‘या’ वेबसाईटला भेट द्या


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट देण्याचे आवाहनही केले.

मोदी म्हणाले, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या, असा मी तुम्हाला आग्रह करतो. तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती या वेबसाईटवर मिळू शकेल. या माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. या वेबसाईटला आपण जरुर भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्धादरम्यान लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाची यावेळी मोदींनी आठवण करुन दिली. ते म्हणाले, कारगिल युद्धावेळी लाल किल्ल्यावरुन अटलजींनी जे म्हटले होते, ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रासंगिक आहे. त्यावेळी देशाला गांधीजींच्या एका मंत्राची अटलजींनी आठवण करुन दिली होती. महात्मा गांधींचा मंत्र होता की, जर कोणाला कधी आपण काय करावे किंवा करु नये हे समजत नसेल तर त्याने भारतातील सर्वात गरीब आणि असहाय्य व्यक्तीबाबत विचार करायला हवा. आपल्या कृतीमुळे या गरीब व्यक्तीचे भले होईल की नाही याचा त्याने विचार करायला हवा.