मुंबई : आज संपूर्ण देशात कारगिल विजय दिवस साजरा केला जात असून याच दरम्यान या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना देशातील जनतेकडून अभिवादन करण्यात येत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याच दिनानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.
संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये, ‘ये दिल मांगे मोर’ असा उत्स्फूर्त ध्येयवाद घेऊन आपल्या सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवला. सुदैवाने जम्मू काश्मीर मधला हा संपूर्ण सीमा परिसर स्वतः पाहिला आहे. इतक्या कठीण परिस्थितीत आपल्या जिगरबाज सैन्याने लढा दिला आणि विजय मिळवला हे एक आश्चर्य आहे. भौगोलिक, सामरिक दृष्ट्या शत्रू मजबूत स्थितीत असून सुद्धा आपल्या वीरांनी सर्व अडचणींवर मात करून विजयी तिरंगा फडकवला. मला हिमालयातला हा परिसर फिरत असताना सह्याद्रीची अन शिवछत्रपतींच्या रणमर्द मावळ्यांची आठवण आली. मातृभूमीच्या रक्षणार्थ सर्वस्व समर्पित करणाऱ्या त्या शूर वीरांना मनोमन नमन करतो, असे म्हटले.
आज कारगिल ‘विजय दिवस’ ला 21 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पुन्हा नव्याने ‘ये दिल मांगे मोर’ असे म्हणावे वाटत आहे. कारण आपला बराच भूभाग शत्रूच्या ताब्यात आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी भारताचा भूभाग व्यापला आहे. तो चिनव्याप्त अन पाकव्याप्त भूभाग मराठा लाईट इंफंट्रीचे प्रमुख आणि जनरल पंनू जी यांनी मला दाखवला आहे. ते तेंव्हा या परिसराचे कोअर कमांडर होते. योगायोग म्हणजे दोन दिवसानंतर त्यावेळचे संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे हेही त्या परिसराच्या दौऱ्यावर आले होते, असेही संभाजीराजे म्हणाले.
त्याचबरोबर एक गोष्ट सांगावी वाटते की, देशाच्या जवळपास सर्व सीमांवर जाण्याची, त्यांच्या समवेत राहून परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. मला स्वतःला सैन्य दलांच्या वर्दीचे प्रचंड आकर्षण सुद्धा आहे. बेळगावच्या मराठा लाईट इंफंट्रीच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये कमांडोचे प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे. छत्रपती घराण्याचा वारस असल्यामुळे भारतीय सेनादलांमध्ये अमच्याविषयी एक आदराची भावना आहे. शेकडो वर्षांचा ऋणानुबंधाचा धागा आजही छत्रपती घराण्याने आणि सैन्य दलांनी सुद्धा जपल्याचेही संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.