देशात मागील २४ तासात ५० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ७४० जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता देशात ३० ते ३५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आता ५० हजारांच्या घरात पोहचली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात तब्बल ४९ हजार ३१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कोरोनाबाधितांची वाढ आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात देशात ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण ३०,६०२ कोरोनाबळी झाले आहेत.

देशातील कोरोना रुग्णवाढीचा हा नवा उच्चांक नोंदविण्यात आल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १२,८७,९४५ वर पोहोचला आहे. देशभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत देशात ८,१७,२०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,४०,१३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

मागील तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी आता चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून, रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यांशी समन्वय साधून केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे. कोरोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव होत असलेल्या भागांत केंद्राकडून तज्ज्ञांची पथके पाठविण्यात येत आहेत.

दरम्यान राज्यात काल दिवसभरात ९८९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याच काळात २९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातील रुग्ण संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत १२,८५४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात पुणे (१८००), पिंपरी-चिंचवड (९५०), मुंबई (१२४५), कल्याण-डोंबिवली (४१४), ठाणे (३५१), मीरा-भाईंदर (२९३), वसई-विरार (३०२), नाशिक (३८३) रुग्ण आढळले. उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे जिल्हा (४१,३५७), ठाणे जिल्हा (३६८५७), मुंबई (२२९५८), नाशिक (४७४९), औरंगाबाद (४६९२) रुग्ण आहेत.