चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्याकडून शिक्कामोर्तब; 8 नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना


नवी दिल्ली – आयपीएलच्या वाटेतील सर्व विघ्न दूर झाली असून आयपीएलचा तेरावा हंगामा 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी यंदाची आयपीएल यूएईत होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता पुढील आठवड्यात स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

आयपीएल 26 सप्टेंबरला होईल, अशी चर्चा आतापर्यंत होती. पण, पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार असून 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात 3 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार असून त्यापूर्वी टीम इंडियाला 14 दिवस क्वारंटाईन होणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

19 सप्टेंबरला आयपीएल सुरू होण्याची शक्यता अधिक आहे आणि 8 नोव्हेंबर (रविवारी) अंतिम सामना होईल. आम्हाला आयपीएलसाठी 51 दिवस मिळत आहेत आणि फ्रँचायझी व ब्रॉडकास्टर अन् अन्य भागधारकही या तारखांवर समाधानी होतील, असे पटेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 51 दिवस मिळत असल्याने कमीच डबल हेडर सामने होतील. सात आठवड्यांच्या या कालावधीत आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्ही पाचच डबल हेडर खेळवू. त्यामुळे सरावासाठी खेळाडू महिनाभर आधी म्हणजेच 20 ऑगस्टला यूएईला रवाना होतील.

तत्पूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलले आणि बीसीसीआयला दिलासा मिळाला. आयपीएलच्या 13 व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बीसीसीआयने यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने यंदाच्या परदेशवारीसाठी विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू केलेली असल्याची माहिती पुढे आली आहे.

‘एमिरेटस्’ आणि ‘इत्तेहाद’ या विमान कंपनीसोबत बीसीसीआयचे काही अधिकारी चर्चा करत आहेत. भारत ते युएई असा प्रवास ऑगस्ट महिन्यात खेळाडूंना करायचा असेल तर विमानांचे बुकिंग व इतर गोष्टींवर काम सुरू झाल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले. खेळाडूंना दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा विविध आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युएईमध्ये न्यावे लागेल. यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जात आहे.

खेळाडूंव्यतिरिक्त बीसीसीआयचे काही अधिकारी दुबई, शारजा आणि अबू धाबी येथे तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा घेणार आहेत. आयोजनाच्या बाबतीत आयपीएलची वेगळी ख्याती असल्यामुळे यंदा युएईमध्ये स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.