यंदाच्या स्वातंत्र्य दिनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटाचा कहर हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

त्यातच पुढील महिन्यात १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे, दरवर्षी स्वातंत्र्यता दिनी मोठ्या उत्साहाने देशप्रेमी तिरंगा ध्वज फडकवतात. तसेच देशभरातील राज्यांमध्ये शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम पार पाडले जातात. तसेच या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात पण यंदाच्या स्वातंत्र्यता दिनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे केंद्र सरकारने हा दिवस साजरा करणाऱ्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

कशारितीने स्वातंत्र्यता दिन कार्यक्रम साजरा करताना सावधनता बाळगावी, सोशल डिस्टेंसिंगचं पालन केले जावे. मास्क घालूनच कार्यक्रम करण्यात यावा, ज्याठिकाणी कार्यक्रम होणार आहे तिथे योग्य पद्धतीने सॅनिटायझेशनचे करण्याची व्यवस्था असावी. गर्दी टाळावी, त्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे असे या मार्गदर्शक सूचीमध्ये सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अशाप्रकारे आहेत मार्गदर्शक सूचना

  • स्वातंत्र्य दिनी कोणत्याही भव्य प्रकारचा कार्यक्रम टाळावा, लोकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत Web Cast च्या माध्यमातून कार्यक्रम करावा.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात सशस्त्र दल आणि दिल्ली पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. राष्ट्रीय ध्वज फडकवणे, पंतप्रधान मोदींचे भाषण, त्यानंतर लगेच राष्ट्रगीत आणि अखेर तिरंग्याचे फुगे हवेत उडवले जातील.

आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या राज्य सरकारसाठी सूचना

  • मुख्यमंत्री सकाळी ९ वाजता राज्याच्या राजधानीत ध्वजारोहन करतील, राष्ट्रगीत, पोलीस गार्ड-पॅरा मिलिट्री फोर्सेस, होम गार्ड्स, एनसीसीकडून गार्ड ऑफ ऑनर दिले जाईल. मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल.
  • छोट्या स्वरुपाचा हा सोहळा होईल. म्हणजे जास्त गर्दी होणार नाही. सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जाईल. यादरम्यान मास्क घालणे अनिवार्य आहे
  • स्वातंत्र्य दिनी समारंभात कोरोना योद्धा डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना बोलावले जाऊ शकते. कारण कोरोना विरोधातील युद्धात त्यांच्या योगदानाचे कौतुक करता येईल. तसेच कोरोना संसर्गापासून बरे झालेल्या काही लोकांनाही आमंत्रित केले जाऊ शकते.

या गोष्टींची काळजी जिल्हास्तरीय, तहसील व ग्रामपंचायत स्तरावर देखील घ्यावी लागेल. त्याचबरोबर १५ ऑगस्ट रोजी राज्यातील राजधानी, जिल्हा आणि पंचायत स्तरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात येईल याची खात्री करुन घ्यावी लागेल, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.