कोरोना संकटात एचसीएल करणार 15 हजार जणांची कॅम्पस भरती

कोरोना संकट असतानाही आयटी सर्व्हिस कंपनी एचसीएल टेक्नोलॉजीस या वर्षी 15 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कोरोना संकट असतानाही कंपनीच्या सेवेसाठी चांगली मागणी आहे व पुढे देखील चांगले ऑर्डर मिळाले आहेत. त्यामुळे कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेनुसार, कंपनी थेट कॅम्पसमधून 15 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. मागील वर्षी कंपनीने जवळपास 9 हजार फ्रेशर्सची भरती केली होती. कंपनीने आपली भरती आणि ऑनबोर्डिंग प्रक्रिया व्हर्च्युअल केली आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, ही भरती दोन आधारावर केली जात आहे. एक म्हणजे कंपनीच्या वृद्धीमुळे लोकांची गरज आहे व दुसरे म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याने जागा खाली आहेत. कंपनीच्या एचआर प्रमुखांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे देशातील कॉलेज कॅम्पस बंद आहेत, त्यामुळे भरती प्रक्रिया हळू झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने जवळपास 1 हजार फ्रेशर्सची भरती केली.

दरम्यान, कंपनीला जून तिमाहीत मोठा फायदा झाला आहे. तसेच, शिव नाडर यांनी चेअरमन पद सोडले असून, त्यांची जागा रोशनी नाडर मल्होत्रा यांनी घेतली आहे.