अण्णाशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार शेवंता


अल्पावधीतच झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. प्रेक्षकांनी जसा मालिकेच्या पहिल्या पर्वाला भरभरून प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. पण ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. कारण शेवंता अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे.

नाईक वाड्यात माईने हळदी कुंकवाचा घाट घातलेला असतानाच हातात हिरवाचुडा, कपाळावर मोठ्ठं कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. आपला पण शेवंताने पूर्ण केला आणि अण्णांशी लग्न केले. पण आता नाईकवाड्यात शेवंताला प्रवेश मिळेल की यामागेसुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे हे येत्या भागातच स्पष्ट होणार आहे.

अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची भूमिका साकारत असून अण्णांची भूमिका माधव अभ्यंकर हे साकारत आहे. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. गूढ आणि थरारपूर्ण कथानक असलेल्या या मालिकेची प्रेक्षकांमध्ये आता आणखी उत्सुकता वाढली आहे.