गोविंदाची आगडपाखड ; ४-५ जणच पाहतात बॉलीवडूचा सारा कारभार


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये सुरु असलेली घराणेशाही आणि कंपूशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच बॉलीवूडमधील बड्या हस्ती म्हणजेच करण जोहर, महेश भट्ट आणि सलमान खान या सारख्यांवर अभिनेत्री कंगना राणावत वारंवार घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सर्वच माध्यमांमध्ये हाच मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर कंगना राणावताच्या या भूमिकेचे अनेकांनी समर्थन करत आपले मत देखील व्यक्त केले आहे. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. ती म्हणजे बॉलीवूडच्या राजा बाबूची अर्थात अभिनेता गोविंदाची. त्याने देखील बॉलीवूडमधील घराणेशाहीवर आपले मत व्यक्त करत बॉलीवूडचा सारा कारभार ४-५ जणांच्या हाती असल्याचे त्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अभिनेत्री निर्मला देवी आणि अरुण कुमार आहुजा यांचा मुलगा असून सुद्धा मला बॉलीवूडमध्ये स्थान मिळविण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागल्याचे गोविंदाने म्हटले आहे. तसे पाहायला गेले तर गोविंदा हे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि उत्कृष्ठ डान्सर म्हणून ओळखले जाते. पण ही लोकप्रियता मिळविण्यापूर्वी त्याला कराव्या लागलेल्या संघर्षावर त्याने भाष्य केले आहे.

बॉलीवूडमध्ये मी वयाच्या २१ व्या वर्षी पदार्पण केले. जवळपास ३३ वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर बॉलीवूडमधील माझा वावर मी हळूहळू कमी केला. मी जेव्हा यातून बाहेर पडत होतो. ज्यावेळी मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी असे अनेक नवोदित निर्माते होते, ज्यांना माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी माहित नव्हते. मला अनेक वेळा त्या निर्मात्यांना भेटण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत होती. ते असे का वागत होते याची मला पूर्ण कल्पना होती. परंतु, त्यांच्या या वर्तनाचा मी माझ्या कामावर आणि स्वत:वर कधीच परिणाम होऊ दिला नाही. मला माहित होते राज कपूर, जितेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि राजेश खन्ना यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी अशा परिस्थितीचा सामना केला आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे योग्य दृष्टीकोन हवा. एकतर तुम्ही प्रचंड मेहनत करा, नाही तर मग तुमच्याविषयी कोण काय बोलत आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, असे त्याने म्हटले आहे.

गोविंदा पुढे म्हणाला, आमच्याकाळात ज्याच्याकडे टॅलेंट होते त्याला काम मिळत होते. सगळ्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत होती. परंतु, आता चार-पाच लोकांनी संपूर्ण कारभार हातात घेतल्यामुळे जे लोक यांच्या जवळचे नाहीत त्यांच्या चित्रपटाचे नशीब हेच लोक ठरवतात. माझ्या काही चांगल्या चित्रपटांना प्रदर्शितच करता आले नाही. पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे.