टाकाऊ ते टिकावू; बाजारात आला ऊसाच्या वेस्टपासून तयार केलेला बायोमास्क


नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोनाचा सामना करण्यात मास्क आणि सॅनिटाईझर ही दोन महत्वाची अस्त्रे कामी येत आहेत. त्याचमुळे देशात सध्या मास्कची मागणी वाढत आहे. त्यातच या संकटकाळात बायोमेडिकल वेस्टचे संकटसुद्धा निर्माण झाले आहे. आरोग्यासाठी फेकलेले मास्क, ग्लोव्हज मोठी समस्या बनत आहेत. पण आता या समस्येवर उपायदेखील शोधला जात आहे. एक असा बायोमास्क दिल्लीची एक कंपनी एफीबरने बनवला आहे, जो ऊसाच्या वेस्टपासून तयार होतो, आणि त्याचा 30 वेळा वापर केल्यानंतर मातीत टाकल्यानंतर तो नष्ट होतो.

याबाबत माहिती देताना एफीबर ग्रुपचे फाऊंडर राजेश भारद्वाज यांनी सांगितले की, बायोफेस मास्क एक बायोडिग्रेडेबल मास्क असून अँटी बॅक्टेरिया प्रॉपर्टीसुद्धा यामध्ये आहे. पीएलए कम्पाऊंड आणि पॉलिएटिक अ‍ॅसिडपासून हा मास्क तयार केला आहे. त्याचबरोबर हा एक बायोडिग्रेडेबल आणि अ‍ॅटी बॅक्टेरियल मास्क आहे. तसेच तुम्ही 30 वेळा धुवून हा मास्क वापरू शकता. आपल्याला मास्क बदलण्याची जी वारंवार गरज भासते, ती भासणार नाही. बायोमासपासून तयार झालेल्या वस्तू निसर्गाकडून घेत आहोत आणि निसर्गाला परत देत आहोत. बायोमासपासून बनवलेले मास्क वापरल्यानंतर ते मातीत टाकल्यानंतर ते नष्ट होतील.

जपानची टीव्हीएम कंपनी लिमिटेडची बायोमास्कची टेक्नोलॉजी आहे आणि एफिबरसोबत करार केला आहे. लोकलायजेशनवर कंपनी फोकस करत असून 145 ते 150 रुपये इकोनॉमी बायोमास्कची किंमत आहे, तर प्रीमियम मास्कची किंमत 450 ते 500 रुपये आहे.