मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये ‘या’ बँकांनी केले मोठे बदल


नवी दिल्लीः मिनिमम बॅलन्स आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांत देशातील काही प्रमुख बँकांनी मोठे बदल केले आहेत. 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा या बँकांनी केली आहे. बँकेने हे नियम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बदलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेकडून हे शुल्क लागू करण्यात येणार आहे.

किमान 2 हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेदारांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात ठेवणे आवश्यक आहे, ज्याची मर्यादा याआधी 1,500 रुपये होती. उर्वरित रक्कम 2000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये शुल्क आकारणार आहे.

100 रुपयांपर्यंत शुल्क बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी आकारले जाणार आहे. तसेच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी केली गेली आहे. परंतु लॉकरवरील दंड वाढविण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी, त्याचबरोबर बँकेत कमी लोक यावेत, यासाठी सध्या हे सर्व बँक करीत आहे. त्याचबरोबर बँकेच्या सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.

तसेच अ‍ॅक्सिस बँक खातेदारांना आता ECS व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. पूर्वी कोणतेही शुल्क ECS व्यवहारांवर आकारले जात नव्हते. खासगी बँकेने 10/20 रुपये आणि 50 रुपये बंडलप्रमाणे 100 रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग शुल्क आकारणार आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्याने व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांना खाते श्रेणीनुसार किमान शिल्लक बॅलन्स न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.