संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची शिफारस!


मुंबई – मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या पक्षांतर्गत संघर्षामुळे काँग्रेसने आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या स्वकियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाच्या आरोपांतर्गत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवू शकते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हायकमांडकडे याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी रिपोर्ट सादर करुन संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सचिन पायलट यांच्या प्रकारानंतर आता पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच एआयसीसीच्या रडारवर ट्विट करणारे काही नेते आहेत. तर माझे कोणतेही वक्तव्य अथवा ट्विट कोणत्याही प्रकारे पक्षविरोधी कारवायांचा भाग असल्याचे मला वाटत नसल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले आहे.

संजय निरुपम याबाबत टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हणाले की, पहिल्या दिवसापासून माझे राज्यात महाविकास आघाडी बनवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत आहे. सरकारमध्ये आताही काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही, सर्व काम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून करत आहे. मुंबईत मागील ६ महिन्यापासून काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नाही, संपूर्ण पक्ष क्वारंटाईन झाला असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

तसेच निरुपम यांनी गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली होती. ते म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये दोन गट आहेत, त्यातील एक सोनिया गांधी आणि दुसरे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आहेत. सोनियाचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनाही त्यांनी लक्ष्य केले होते.

राज्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचार न करण्याची घोषणा निरुपम यांनी केली होती. त्याचबरोबर ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये सरकार स्थापण्याच्या बाजूने नव्हते. त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याजवळील मालमत्ता खरेदीची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. यावर शिवसेनेने महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत तीव्र निषेध नोंदविला होता.


अलीकडेच संजय निरुपम यांनी सचिन पायलटच्या बाबतीतही त्यांना रोखण्याचे आवाहन केले होते. निरुपम म्हणाले होते की, जर सर्व लोक एकेक करून निघून गेले तर पक्षात कोण राहील? त्यामुळे ज्याला जायचे असेल त्यांना जाऊ द्या असे समजू नका अशी विचारसरणी आजच्या संदर्भात चुकीची आहे. सचिन पायलट समजावून सांगा आणि थांबवा असे ते म्हणाले होते.