पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून ४९५५ पानांचे आरोपपत्र दाखल


मुंबई – सीआयडीकडून पालघर मॉब लिचिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सीआयडीकडून दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी न्यायालयात ४९५५ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पालघरमधील गडचिंचले येथे १६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी १५४ जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पाच पोलिसांना देखील निलंबित करण्यात आले असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यासह देशभरात पालघरमधील घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर राज्य सरकारवर यामुळे टीका होऊ लागल्यानंतर सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेला सीयआडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डहाणू कोर्टात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचे आरोपपत्र पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी दाखल केले आहे.

आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीकडून ८०८ संशयितांची चौकशी करण्यात आली असून १०८ साक्षीदांरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी १५४ जणांना अटक करण्यात आलेली असून ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. जामीनावर कोणत्याही आरोपीला सोडण्यात आले नसल्याची माहिती सीआयडीने दिली आहे.