पुणे – कोरोनामुळे रखडलेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर करण्यात आला असून बारावीचा राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. ४.७८ टक्क्यांनी यंदा निकालात वाढ झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीही बाजी मारली आहे. ९३.८८ टक्के मुलींचा निकाल लागला आहे. तर ८८.०४ टक्के मुलांचा निकाल लागला आहे.
शाखा निहाय निकाल
- कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
- वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
- विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
कोकण विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात बाजी मारली आहे. ९५.८९ टक्के एवढा कोकणचा निकाल लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के एवढा लागला आहे.
फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे लांबलेला इयत्ता बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांमधील उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. अखेर आज ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला आहे.
निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या
१) www.mahresult.nic.in
२) www.hscresult.mkcl.org
३) www.maharashtraeducation.com
17 जुलै ते 27 जुलै या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी व 17 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत छायांकित प्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्जासाठीचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत विहित नमुन्यात विभागीय मंडळांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
कोकण | 95.89 टक्के |
पुणे | 92.50 टक्के |
कोल्हापूर | 92.42 टक्के |
अमरावती | 92.09 टक्के |
नागपूर | 91.65 टक्के |
लातूर | 89.79 टक्के |
मुंबई | 89.35 टक्के |
नाशिक | 88.87 टक्के |
औरंगाबाद | 88.18 टक्के |