आता नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी श्रीरामांच्या अस्तित्वावरच उभे केले प्रश्नचिन्ह


काठमांडू – भारताशी हजारो वर्षांपासून सांस्कृतिकदृष्ट्या नाळ जोडल्या गेलेल्या नेपाळमध्ये भारतविरोधात सध्या कमालीचा रोष तीव्र व्यक्त होताना दिसून येत असल्यामुळेच भारतापासून राजकीय दृष्ट्या दूर जात असतानाचा भारत आणि नेपाळमध्ये असलेले समान सांस्कृतिक नातेही तोडण्याच्या प्रयत्नात नेपाळमधील नेते दिसत आहेत.
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी परवा भगवान श्रीराम हे भारतीय नसून नेपाळी असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.


पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलेल्या वक्तव्याचा बचाव करताना नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले की, अजूनही नेपाळ आणि भारतात रामायणकालीन संस्कृतीबाबत अभ्यास सुरू आहे. आपण आतापर्यंत केवळ विश्वासाच्या आधारावर रामासंबंधीच्या सर्व गोष्टींना मानत आलो आहोत.


जिथपर्यंत मला माहिती आहे त्यानुसार सध्यातरी आपल्याकडे रामायणाच्या पौराणिक अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. आतापर्यंत केवळ पारंपरिक विश्वासाच्या आधारावर आपण सांगत होतो की, सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला आणि रामाचा जन्म अयोध्येत झाला, मात्र ज्यावेळी संशोधनातून काही वेगळे पुरावे समोर येतील तेव्हा रामायणाचा इतिहासच बदलणार आहे. सध्यातरी लोकांच्या भावनेशी या गोष्टी जोडल्या गेलेल्या असल्यामुळे याबाबत फार काही बोलणे योग्य ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर कुठे कुठे रामायणकाळात चर्चेत राहिलेली ठिकाणे आहेत यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्याचा सांस्कृतिक भूगोलाला अंतिम रूप देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे बुद्धकाळाबाबत आपल्याकडे लिखीत आणि अन्य आधारावर पुष्टी करणारे पुरावे आहेत, त्याप्रमाणे रामायणाचे पुरावे नाहीत, असा दावाही ज्ञावली यांनी केला.

Leave a Comment