कोरोनामुक्त धारावीच्या श्रेयवादात उगाच संघाला ओढण्याचे काही कारण नाही


मुंबई – जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल कौतुक करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावी कोरोनामुक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केलेल्या कामामुळेच झाल्याचा दावा केला आहे. चंद्रकांत पाटील यांचा दावा शिवसेनेने फेटाळून लावत यांना संकटसमयी हे असले प्रकार सुचतात तरी कसे? अशी विचारणा केली आहे, त्याचबरोबर काही चांगले झाले तर ते आमच्यामुळे…रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे, असाही टोला शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.

धारावीतून कोरोना आज पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे कबूल केले. सध्या राज्यभर विरोधी पक्षनेते फडणवीस हे दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे, यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे, पण धारावीत जे कोरोनावर यश मिळाले ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!, असा नवा प्रचारी फंडा राबवला जात आहे. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱ्या कपड्यातील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. संकटसमयी हे असले प्रकार यांना सुचतात तरी कसे?, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

कोणी संघाचे काम चांगले नाही असे म्हणणार नाही, पण सर्वच यंत्रणांनी धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कार्यात मेहनत घेतली आहे. हे सामुदायिक यश आहे, पण त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे कोरोना युद्धात संघाला उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढत असल्याचे सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे.

Leave a Comment