अखेर सचिन पायलट यांची तलवार म्यान !


नवी दिल्ली : कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण आता राजस्थानचे उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड अखेर थंड झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर भाजप प्रवेशाची शक्यताही सचिन पायलट यांनी फेटाळून लावली आहे. तर 109 आमदाराचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसनेही जाहीर केले आहे.

काँग्रेसच्या कार्यकरिणीची राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर बैठक पार पडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या बैठकीत दोन्ही नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरुन राहुल गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. तसेच दुसरीकडे सकाळपासून राहुल गांधी यांच्या सचिन पायलट हे संपर्कात होते. कोणताही मोठा निर्णय सचिन पायलट यांनी घेऊ नये, त्यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप त्यांना देण्यात आला आहे. तर प्रियांका गांधी यांनीही मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.

दरम्यान, काँग्रेसकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही हा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठविला आहे. गहलोत सरकार स्थिर आहे, बहुमत सिद्ध करेल आणि गहलोत यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास असल्याचे अजय माकन यांनी स्पष्ट केले. तसेच, बंडखोर नेत्यांशीही सहानुभूतीपूर्वक वागले पाहिजे, असे निर्देश राहुल गांधींनी दिले असल्याची माहिती माकन यांनी दिली.

तर दुसरीकडे 100 पेक्षा जास्त आमदार राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या निवास्थानी बोलावल्या बैठकीला उपस्थितीत होते. त्यामुळे दोन दिवसांपासून पेटलेल्या वादावर यामुळे पडदा पडला. परंतु, या बैठकीला सचिन पायलट यांचे समर्थक गैरहजर होते. भाजपमध्ये जाण्यास सचिन पायलट यांनीही नकार दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे. आता सचिन पायलट परत काँग्रेसमध्ये येतात की वेगळा निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment