
लखनौ – आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून 15 जुलैपूर्वी सीबीएसईचे निकाल जाहीर होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये लखनौची विद्यार्थीनी असलेल्या दिव्यांश जैन हिने 600 पैकी 600 गुण मिळवत विक्रम रचला आहे. नवयुग रेसिडेन्सची विद्यार्थीनी असलेल्या दिव्यांशीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पैकीच्या पैकी गुण मिळवत सीबीएसईच्या परीक्षेत दिव्यांशीने रचला विक्रम
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत असे विक्रमी यश मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण वर्षाच्या सुरुवातीपासूनच मी अभ्यास केला होता. अभ्यासावर मी सातत्याने लक्ष केंद्रीत केले होते, त्यात विशेष म्हणजे स्वअभ्यासाला मी सर्वाधिक प्राधान्य दिले, वारंवार रिव्हीजनही केल्याचे दिव्यांशीने म्हटले आहे. दिव्यांशीचे वडिल राकेश जैन यांचे लखनौमध्ये दुकान असून आई सीमा जैन या गृहिणी आहेत. दरम्यान विद्यार्थी cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतात.
