मध्य प्रदेशसारखीच राजस्थानातही होणार ऑपरेशन लोटसची पुनरावृत्ती?


नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील सत्तेवरून कमलनाथ सरकारला तीन महिन्यांपूर्वी पायउतार व्हावे लागले होते. त्यानतंर आता राजस्थान काँग्रेससाठी नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. कारण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर राजस्थानात वेगवान घडामोडी घडल्या असून, २२ आमदारांसह उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत दाखल झाल्यामुळे राजस्थानातही मध्य प्रदेशमधील राजकीय पॅटर्नची पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबतच भाजपमध्ये काँग्रेसचे काही आमदारही दाखल झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येऊन कोसळल्यानंतर मध्य प्रदेशातील सत्तेची सूत्र भाजपने हाती घेतली. या घटनेला तीन महिने लोटत नाही, तोच राजस्थानातही अस्थिरतेचे हादरे जाणवू लागले आहेत. सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केल्यानंतर काल (११ जुलै) राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेले. या आमदारांना हरयाणातील गुरुग्रामध्ये एका रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे.

आमदार शनिवारी रात्री ‘आयटीसी हॉटेल ग्रॅण्ड’मध्ये दाखल झाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या हॉटेल बाहेरील हालचाली वाढल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये हे आमदार येणार असल्याची माहिती आधीपासूनच मिळाली होती. त्यामुळे यंत्रणा आधीच सर्तक झाली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अविश्वास असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे सचिन पायलट हे नाराज असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment