अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये सुरु असलेली घराणेशाही आणि कंपूशाही या मुद्यावरुन सोशल मीडियावर रान पेटले आहे. याच दरम्यान कंगना रानावत, सोनू निगम, शेखर सुमन अशा अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला. त्यात आता गायक अभिजीत भट्टाचार्य याची देखील भर पडली आहे. याचमुद्यावरुन त्याने थेट बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानलाच लक्ष्य केले आहे. एखादे गाणे कोणी गायला हवे आणि कोण गाऊ नये हे ठरवणारा सलमान कोण? असा संतप्त सवाल त्याने विचारला आहे.
बॉलीवूडच्या भाईजानवर गायक अभिजीत भट्टाचार्यची आगपाखड
अभिजीत 90 च्या दशकातील काळ आणि आत्ताचा काळ याची तुलना करताना म्हणाला, बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात कोणत्याही प्रकारची गटबाजी नव्हती. पण सध्याच्या या गटबाजीमुळे संपूर्ण सिनेइंडस्ट्री गढूळ झाली आहे. त्यावेळी संगीत क्षेत्राची एवढी दयनीय अवस्था नव्हती. त्याकाळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकार चित्रपटात कोण गाणार हे ठरवायचे. पण आता काही कंपन्या आणि चित्रपटाचे कलाकार गाणे कोण गाणार हे ठरवतात. एखादे गाणे कोण गाणार, कोण नाही हे ठरवणारा सलमान कोण? गायकाकडून गाणे काढून ते स्वत: गाणारा हा आहे तरी कोण? हा तर एकप्रकारे सरळ सरळ भेदभाव आहे.