मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत शिवसेनेला ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती असल्याचा टोला राणे यांनी लगावला आहे. सत्तेत असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नसल्यामुळे या महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. त्याचबरोबर शिवसैनिकाना सध्या कोणीच वाली नसल्याची स्थिती आहे, अशी टीका राणे यांनी केली.
त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा देखील राणे यांनी दिला आहे. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेली चालणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.