रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चेला पीयूष गोयल यांच्याकडून पूर्णविराम


नवी दिल्ली – रेल्वेच्या खासगीकरणाबाबत चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. तसेच रेल्वे मंत्रालयाच्या खासगी ट्रेन चालवण्याच्या निर्णयानंतर रेल्वेच्या खासगीकरणाबाबतच्या चर्चांना सर्वाधिक उधाण आले होते. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पीयूष गोयल यांनी रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती दिली.


यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक ट्विट केले आहे. १०९ मार्गांवर खासगी भागीदारीतून १५१ अतिरिक्त अत्याधुनिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या रेल्वे गाड्यांमुळे नवे रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.

सद्यस्थितीपेक्षा ज्या ठिकाणी सर्वोधिक मागणी आहे, त्याच मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना अत्याधुनिक रेल्वे गाड्यांमुळे अधिक सुविधा मिळणार असल्यामुळे सद्यस्थितीतील रेल्वे गाड्या आणि तिकिटांच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हेच यामागील कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment