नवी दिल्ली – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली स्पोर्ट्स तकच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या आशिया चषकाचे आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती माहिती दिली. याबद्दल अद्याप आशियाई क्रिकेट परिषद किंवा स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क असलेल्या पाक क्रिकेट बोर्डाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सौरव गांगुलीने इन्स्टा लाईव्ह सेशनमध्ये एशिया कप कॅन्सल हो चुका है, जो सप्टेंबर मे था… अशी माहिती दिली. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाला पीएसएलचे आयोजन पुढे ढकलून त्या जागेवर आशिया चषक खेळवण्याची विनंती केली होती, पाक क्रिकेट बोर्डाने ज्याला नकार दिला होता. ४ हजार कोटींचे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत तेराव्या हंगामाचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अंतिम निर्णय घेण्याची वाट बीसीसीआय पाहत आहे.
त्याचबरोबर गांगुलीने भारतीय संघ मैदानात कधी पुनरागमन करणार याबद्दल ठोस माहिती देण्यास नकार दिला. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पून्हा केव्हा पुनरागमन करेल, हे आताच सांगता येणे जरा कठीण आहे. तरी देखील आम्ही सर्व तयारी केली आहे, पण सरकार जोपर्यंत नियम स्पष्ट करत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. प्रत्येक खेळाडूचे आरोग्य आमच्यासाठी महत्वाचे असल्यामुळे आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही.