राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या पारनेरच्या ‘त्या’ नगरसेवकांची पुन्हा शिवसेना वापसी


मुंबई : काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामती येथे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता तेच पक्षांतर केलेले सहा नगरसेवक शिवसेनेत पुन्हा वापसी करण्याच्या तयारीत आहे. हे सहाही नगरसेवक सध्या ‘मातोश्री’वर पोहोचले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. या सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आले आहेत.

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्व नगरसेवकांनी भेट घेतली. ही भेट मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात घडवून आणली. अजित पवार, सहा नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्ध्या तासपासून चर्चा झाली. पारनेर येथील शिससेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी मध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत गेलेल्या सहाही नगरसेवकांनी घरवापसीचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान पारनेर नगर पंचायतीचे शिवसेनेचे किसन गांधाडे, डॉक्टर मूद्द्सर सय्यद, नंदू देशमुख, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांनी 4 जुलै रोजी बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता, दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता पारनेर नगर पंचायतीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावली असल्याची माहिती समोर आली होती,त्यामुळे राज्यात असलेल्या महा विकास आघाडी सरकारमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात होते , पण वास्तविक पाहाता आम्ही शिवसेना पक्षावर किंवा पक्ष प्रमुखांवर नाराज नसून स्थानिक नेतृत्वामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या पाचही नगरसेवकांनी दिली आहे.

Leave a Comment