उद्धव ठाकरेंसारखा निष्क्रिय मुख्यमंत्री मिळणे नाही – नारायण राणे


मुंबई: सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ताशेरे ओढत या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर मातोश्रीच्या पिंजऱ्यात उद्धव ठाकरे हे बंद असल्याची जळजळीत टीका केली आहे. गेल्या अनेक महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीतून बाहेर पाऊल टाकलेले नाही. ते बाहेर पडले तरी फार काही बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी अनेक महिने मंत्रालयाचे तोंडही पाहिले नसल्यामुळे त्यांचा आदेश सरकारी अधिकारी पाळत नाही. असा मुख्यमंत्री जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही आणि कोणी ठेवणारही नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राज्यातील उद्योगधंदे कोलमडून पडले आहेत, तरी मुख्यमंत्री डोळे मिटून आहेत. लोकांना पगार मिळत नाहीत. तरी मुख्यमंत्री फक्त लॉकडाऊन करत आहेत. कारण ते निष्क्रिय असल्यामुळे प्रशासन नीटपणे चालवू शकत नसल्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मी मागणी केली होती. मी आजही ठाम माझ्या मागणीवर असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

मुंबईसारखे जागतिक दर्जाचे शहर आज भकास होत चालले आहे. याला शिवसेना जबाबदार आहे. मुंबई महानगरपालिकेत जितका भ्रष्टाचार आहे, तसा अन्य कुठल्याही संस्थेत नाही. दिवाळखोरीत गेलेली बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने जात असल्याचीही टीका राणे यांनी केल्यामुळे आता नारायण राणेंच्या या टीकेला शिवसेना कशी प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment