नवी दिल्ली – मागील महिन्याच्या १५ तारखेला पूर्व लडाखमधील भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरातील नागरिकांकडून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर चीनचा अनेक ठिकाणी निषेध करत चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी आंदोलनेही झाली.
त्याचबरोबर चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी सरकारी स्तरावरही हालचाली सुरु झाल्या आहेत. ५९ चिनी अॅपवर केंद्र सरकारने बंदी घालण्याबरोबरच चिनी कंपन्यांच्या रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रांमधील कंत्रांटवर बंदी घालणे, स्थगिती देणे असे निर्णय मागील काही दिवसांमध्ये घेतले आहेत. पण चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची सरकारी पातळीवर सुरु असणारी ही मोहीम आता कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत पोहचली आहे.
The unprovoked attack by the Chinese on Indian soil on our brave jawaans has been a huge wake up call and a clarion call for action – we @TheJSWGroup have a net import of $400mn from China annually and we pledge to bring this down to zero in the next 24 months #BoycottChina
— Parth Jindal (@ParthJindal11) July 2, 2020
आता जेएसडब्ल्यू या बड्या कंपनीने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहीमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षांमध्ये चिनीमधून होणारी आयात पूर्णपणे बंद करण्याचे उद्दीष्ट कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीच्या सिमेंट आणि पेंट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
भारतीय भूभागावर हल्ला करुन चीनने आपल्या शूर जवानांवर हल्ला करुन आम्हाला जागे केले आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपच्या माध्यमातून याच संदर्भात निर्णय घेताना दरवर्षी ४०० बिलियन डॉलरचा माल आयात होतो. ही आयात आम्ही पुढील २४ महिन्यांमध्ये शून्यावर आणून असा आम्ही शब्द देतो, असे पार्थ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
म्हणेज जिंदाल ग्रुप दरवर्षी चीनमधून आयात करणाऱ्या वस्तूंची किंमत ही अंदाजे २९०० कोटी असून कंपनी चीनवर अवलंबून राहणे टप्प्याटप्प्यात कमी करणार आहे. जिंदल ग्रुप आत्मनिर्भर होत चीनमधून पुढील दोन वर्षात आयात पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात असल्याचे पार्थ यांनी स्पष्ट केले आहे.