
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू असलेला लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने शिथील करत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने सुरु आहेत. पण काही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचेही दिसून येत आहे. विशेषत: मास्कचा वापर व्यवस्थित केला जात नसल्यामुळे सार्वजनिक स्थळे, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच दिले आहेत. पण आता या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार, कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
मुंबईकरांनो मास्क वापरा… नाही तर १ हजार रुपये दंड भरा!
राज्यात लागू असलेला लॉकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने शिथील करुन मिशन बिगीन अगेनची घोषणा केली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणताना देण्यात येत असलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. पण काही नागरिक तरी देखील पुरेशी खबरदारी घेत नसल्यामुळे त्यांची वैयक्तिक आणि इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे.
सार्वजनिक स्थळी व कार्यस्थळी मास्क लावणे अनिवार्य
वैयक्तिक/सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना देखील मास्कचा वापर करा
दुकानात उपलब्ध असलेला प्रमाणित/घरगुती मास्क वापरला जाऊ शकतो
नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८नुसार ₹१००० दंड#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 29, 2020
याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीनिशी मास्क लावणे बंधनकारक करुन नियम न पाळल्यास कारवाई करण्याचे परिपत्रक महापालिकेकडून जारी करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना मास्क लावणे हे अतिशय गरजेचे असून त्यामुळे संसर्गाला आटोक्यात ठेवणे शक्य आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर बाळगून आणि मास्क लावून वावरल्याने संसर्गाचा धोका अत्यल्प असतो, असे अभ्यासकांनी वारंवार नमूद केले आहे.
या परिपत्ररकानुसार, कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.
Don't get in 'treble' by not following the rules.
Here’s a special playlist to prevent any risks for you!#PlaylistOfSafety#NaToCorona pic.twitter.com/vYk5YCkEtQ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 29, 2020
प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषधी दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करुन वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करु शकतात. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा प्रत्येक उल्लंघनासाठी रुपये एक हजार इतका दंड आकारण्यात येईल. पोलीस विभाग तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील.
या निर्देशांचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा उपयोग करणे, सुरक्षित अंतराबाबतचे नियम पाळणे, आवश्यक सर्व ती खबरदारी घेणे हे नागरिकांचेदेखील कर्तव्य आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वांकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
