किमान शंभर वारकऱ्यांसह माऊलींची पालखी घेऊन जाण्यास परवानगी द्या; उच्च न्यायालयात याचिका


मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी आषाढातील ‘पंढरपूरची वारी’ ही एक ओळखली जाते. पण यंदा वारीवर कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट आहे. पण तरी देखील किमान शंभर वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपूरात घेऊन जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर आज तातडीने सुनावणी पार पडणार आहे.

शेकडो वर्षांची पंढरपूरच्या वारीची परंपरा आहे. मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या शेकडो मैलांचा प्रवास करुन या सोहळ्यासाठी पंढरपुराकडे येत असतात. पण महाराष्ट्रात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवेसंदिवस वाढ होत असल्यामुळे यंदा सारे सण-उत्सव साधेपणाने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करणे महत्वपूर्ण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पंढरपूरची वारी रद्द करण्यात आल्याचा निर्णय 29 मे रोजी सरकारकडून जाहीर करण्यात आला. तरी असे असले तरी वाखरी ते पंढरपूर या अंतिम 6 किलोमीटरच्या मार्गात 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी काढण्यास परनावगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका वारकरी सेवा संघाने अॅड. मिहिर गोविलकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेच्या माध्यमातून वारीतील महत्त्वाच्या परंपरेतील नगर प्रदक्षिणा, स्नान आणि गोपाळकाला सोबतच पौर्णिमेपर्यंत मुक्कामास राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी शर्तीप्रमाणे स्वच्छता, आरोग्य, आणि सामाजिक अंतर पाळणे, अशा नियमांचे आम्ही पालन करणार असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीने न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment