सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी जवळच्या मित्राविरोधात तक्रार दाखल


बॉलिवूड विश्वात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली असून सध्या बॉलीवूडमध्ये घराणेशाहीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. तसेच पोलिसांकडून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची सुशांतच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी चौकशीही केली जात आहे. अशातच या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. सुशांतचा जवळचा मित्र चित्रपट निर्माता संदीप सिंह यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सुशांतचे कौटुंबिक मित्र निलोत्पल मृणाल यांनी तक्रार दाखल केली आहे. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना एक पत्र लिहून निलोत्पल यांनी सुशांतचा जवळचे मित्र संदीप सिंह यांच्याद्वारे मीडियाशी बोलताना बॉलिवूडला ‘क्लीन चिट’ देणे आणि सुशांतचा मृत्यू सामान्य असल्याचे सांगितल्याचा आरोप लावत आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

दरम्यान एबीपी न्यूजला निलोत्पल यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संदीप सिंहच्या अशा बोलण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. निलोत्पल म्हणाले की, बॉलिवूडला क्लीन चिट देणारा आणि सुशांतच्या मृत्यू सामान्य म्हणणारा संदीप सिंह आहे कोण? कोणाला वाचवण्याचा तो प्रयत्न तर करत नाही ना किंवा त्याला बॉलिवूडमधील कोणी हे सगळे करायला सांगितले आहे का? याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.

निलोत्पल यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. आतापर्यंत कोणत्याच बाबती त्यांनी क्लिन चीट दिलेली नाही. अशातच याप्रकरणी संदीप सिंह यांनी कोणत्याही प्रकारची क्लीन चिट देणे योग्य नाही. तसेच पुढे बोलताना निलोत्पल म्हणाले की, जर याप्रकरणाबाबत कोणतीही माहिती संदीप सिंह यांना असेल, तर त्यांनी या सर्व गोष्टी मीडियाला न सांगता मुंबई पोलिसांना सांगाव्यात. तसेच संदीप सिंह यांचा मोबाईल जप्त करून त्याची फॉरेंसिक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून सुशांतच्या मृत्यूशी निगडीत रहस्यांचा खुलासा करणे सोपे होईल, असेही निपोत्पल यांनी सांगितले आहे.

पोलिसांना निलोत्पल यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, मीडियाशी बोलताना संदीपने सांगितले होते की, सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांना अनेक दिग्गजांनी फोन केला होता. त्यामुळे याबाबतीत चौकशी होणे गरजेचे आहे. यामुळे नक्की ते दिग्गज कोण होते? आणि हे कोणत्याही दबावामुळे तर असे वक्तव्य करत नाहीत ना? तसेच निपोत्पल यांनी सुशांतच्या घरातील नोकर आणि त्याच्या जवळच्या मित्रांच्या फोनची फॉरेंसिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. निलोत्पल यांनी पुढे सांगितले की, मुंबई पोलिसांच्या चौकशीवर त्यांच्या कुटुंबियांना विश्वास आहे. जर कुटुंबियांना पुढे जाऊन पोलिसांच्या चौकशीवर आक्षेप वाटला तर पुढे जाऊन सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपासणीचीही मागणी करू शकतात. दरम्यान निलोत्पल यांनी संदीप सिंह विरोधात केलेल्या तक्रारीबाबत त्यांना काहीच माहिती नसून पोलिसांनी त्यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला नाही.

Leave a Comment