उद्या दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत पंढरपुरात संचारबंदी


पंढरपूर : उद्या म्हणजेच 30 जूनच्या दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत श्रीक्षेत्र पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. यासंदर्भात माहिती देताना सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की, आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात असून आषाढी एकादशी 1 तारखेला आहे. पण पंढरपुरात कोरोनामुळे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून पंढरपुरात येतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी नाकाबंदीही करण्यात आलेली आहे. गर्दी होऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु व्यापारी आणि लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा नवीन प्रस्ताव मान्य केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

सर्व अत्यावश्यक सेवांना या संचारबंदीत सूट देण्यात आल्याचे अतुल झेंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर परवानगी असलेल्या पास धारकांना, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांनाही संचारबंदीत सूट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पासधारकांशिवाय कोणालाही मंदिर प्रदक्षिणा किंवा नगर प्रदक्षिणासाठी प्रवेश देणार नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेटिंग केले आहे. याशिवाय शहरात 1200 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

आषाढी एकादशीला गर्दी न करता आपापल्या घरातून पंढरपुराचं दर्शन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले की, पंढरपुरात दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात येतात, प्रशासन आपले स्वागत करण्यासाठी तयार असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती वेगळी आहे. आपण आपल्या घरी राहूनच पांडुरंगाचे दर्शन घ्यावे आणि पंढरपूरला येणं टाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सर्व भक्तांचे, वारकऱ्यांचे चांगल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. आता फक्त आषाढी एकादशीचा एकच दिवस आहे, ज्या दिवशी 100 टक्के सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment