अमित शहांचे राहुल गांधींना ‘ओपन चॅलेंज’; हिंमत असेल तर, १९६२ पासूनची चर्चा करु


नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गलवाण खोऱ्यातील चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी असे संबोधले होते. त्यांच्या त्याच संबोधनचा आता गृहमंत्री अमित शहा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अमित शहा यांनी राहुल गांधींना ओपन चॅलेंज देत, तुम्हाला जर चर्चाच करायची असेल, तर संसदेत या, मग आपण १९६२ पासून आजवर काय घडले यावर चर्चा करु असे म्हटले आहे. अत्यंत घाणेरड्या प्रकारचे राजकारण देशातील काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष करत आहेत याची मला कीव येते. पाकिस्तान आणि चीनला काँग्रेस नेत्याची ट्विट्स आवडत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा चिंतेचा विषय असल्याचेही अमित शहा यांनी म्हटले आहे.


भारताने अत्यंत स्थैर्याने आणि धैर्याने कोरोना विरोधातील लढाई लढली आहे. आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात कोरोनाची लढाई अत्यंत धैर्याने लढलो आहोत. आपण जगाच्या तुलनेत कोरोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढलो आहोत. जगाच्या तुलनेत आपल्याकडील परिस्थिती बरीच नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आणि दिवे लावले गेले, घंटा वाजवल्या गेल्या. एकाही पोलिसाशिवाय कर्फ्यू पाळला गेला. यासारखी बाब मी तरी माझ्या कारकिर्दीत पाहिलेली नाही. हे सर्वकाही मोदींच्या नेतृत्त्वामुळे शक्य झाल्याचे अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे कोरोनापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हात टेकले हे म्हणणे साफ चुकीचे असल्याचे म्हणत अमित शहांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Comment