
जयपूर – कायदेशीर वादामुळे कोरोनाच्या रुग्णांना बरा करण्याचा दावा करत पतंजलीने शोधून काढलेले औषध चर्चेत आहे. महाराष्ट्रात परवानगीच्या वादा अडकलेल्या या औषधाची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच या औषधाच्या विक्रीवर राजस्थान सरकारने देखील बंदी आणली आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनावरील औषधाची विक्री करताना कुणीही आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
कुणीही कोरोनिलची विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई
कोरोना आजार बरे करणारे कोरोनिल हे औषध रामदेव बाबांच्या पतंजलीने शोधून काढले आहे. कोरोना या औषधामुळे पूर्णपणे बरा होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. पण बाजारात येण्या आधीच हे औषध वादात सापडले आहे. या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीला दिले होते. तसेच या औषधाच्या चाचण्या केल्या जात आहे.
महाराष्ट्र सरकारने चर्चत आलेल्या कोरोनिल या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ असा निर्णय राजस्थान सरकारनेही घेतला असल्याची माहिती राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी दिली आहे. कुणालाही औषधांची चाचणी करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. तसेच सरकारकडे अशा प्रकारची परवानगी कुणीही मागितली नसल्यामुळे या औषधाचा वापर राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोरोना रुग्णांवर करता येणार नाही. जे कुणी या औषधाच्या सरकारच्या परवानगीविना चाचण्या करतील किंवा नागरिकांची दिशाभूल करतील, त्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री शर्मा यांनी दिला आहे.
