एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टींमुळे तणाव आहे. तर दुसरीकडे अशीही काही नाती आहेत, ज्या या सीमेला मानत नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे. जालंधर येथे राहणारे वर कमल कल्याण आणि पाकिस्तानी वधू सुमाइला एकमेंकांच्या गळ्यात वरमाळा घालण्यास अतूर आहेत. मात्र दोन्ही देशातील तणाव आणि कोरोनामुळे त्यांचे लग्न रखडत चालले आहे.
आता सुमाइलाने व्हिसा मिळावी यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विनंती केली आहे. सुमाइला लाहौरच्या जोहनाबाद येथील आहे. जालंधरच्या कमल कल्याण यांच्याशी तिचा 2018 मध्ये साखरपुडा झाला होता. या वर्षी मार्चमध्ये त्यांचे लग्न होणार होते. मात्र कोरोनामुळे लग्न होऊ शकले नाही. याशिवाय सर्व कागदपत्रे असतानाही या पाकिस्तानी वधूला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळण्यास अडचण येत आहे.
कमल कल्याण यांनी सांगितले की, आमचे नाते 5 वर्षांपासून आहे. वडिलांचे नातेवाईक पाकिस्तानमध्ये असल्याने हे नाते जुळले. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत एकदाही सुमाइलाशी भेट झालेली नाही. साखरपुडा देखील व्हिडीओ कॉलवरच पार पडला. कमल यांनी आता सरकारला लवकरात लवकर सुमाइलाला व्हिसा द्यावा अशी विनंती केली आहे. जेणेकरून ते लग्न करू शकतील. दोन्ही कुटुंबानी लवकरात लवकर व्हिसा मिळावी अशी सरकारकडे विनंती केली आहे.