यंदा होणार नाही गोपाळकाला उत्सव, दहिहंडी समन्वय समितीचा निर्णय


मुंबई : देशासह राज्यातील अनेक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असून तत्पूर्वी मुंबईतील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दहिहंडी समन्वय समितीने गोपाळकाला म्हणजेच दहिहंडी उत्सव देखील साजरा करणार नसल्याचे जाहिर केले आहे. दहिहंडी उत्सव यंदा होणार नाही व तो साजरा केला जाऊ नये असे आवाहन दहिहंडी समन्वय समितीने सर्व मंडळांना केले आहे.

हा निर्णय दहिहंडी समन्वय समितीच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला, समितीने ‘सर सलामत, तो पगडी पचासचा’ नारा देत दहिहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचे जाहिर केले. वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने 2020 हे वर्ष जरा अवघडच जात आहे.

गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहे. पण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि अबालवृध्दांचा, आवडता, रांगडा सण बाहेर पडलेला आहे. 2020 च्या या कोरोना संकटाने, या महामारीने मात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.

प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्य सुरक्षा ही कोरोनामुळे टांगणीला लागलेली आहे. मृत्यू आणि जगणे यामधील रेषा फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे, जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे?, असे समितीने म्हटले आहे.

समितीने या सर्व गोष्टींचा विचार करुन यावर्षी श्रीकृष्णजन्माष्टमी सण हा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करायचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल विभागीय पोलीस अधिकारी सूचना करतीलच पण आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल, असे देखील समितीने म्हटले आहे.

मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुसऱ्या दिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे समितीचे मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, असे दहिहंडी समन्वय समितीने म्हटले आहे.

Leave a Comment