जुलैमध्ये होणाऱ्या सीबीएससीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द


नवी दिल्ली – शैक्षणिक क्षेत्राला कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका बसला असून, राज्यातील शालेय परीक्षांसोबतच आता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. दहावी व बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे सीबीएसई बोर्डाने निश्चित केले होते. पण, देशात असलेल्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा ऐन परीक्षेच्या काळात देशात शिरकाव झाल्याने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे सीबीएसई बोर्डाने निश्चित केले होते. पण, देशातील कोरोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचे मूल्यमापन करून मूल्यमापन केले जाणार आहे. तसेच मंडळाने दिलेल्या गुणांवर ज्या विद्यार्थ्यांचे समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात, अशी माहिती सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

Leave a Comment