आयुष मंत्रालयाने पतंजलीला दिले ‘कोरोनील’ची जाहिरात थांबवण्याचे आदेश


नवी दिल्ली – कोरोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने मंगळवारी केला. पण त्यानंतर पतंजलीला या औषधाची जाहिरात करण्यास आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली. पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील आयुष मंत्रालयाने मागितला असून, त्याची पडताळणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. यावर आता पतंजलीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी कम्युनिकेशन गॅप होती, ती आता दूर करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली.

आयुर्वेदाला चालना देणारे हे सरकार आहे. आमच्यात जी कम्युनिकेशन गॅप होती, ती आता दूर झाली आहे. जे काही रँडमाइझ्ड प्लेसबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल्सचे मापदंड आहेत ते १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहेत. आम्ही आयुष मंत्रालयाला याची संपूर्ण माहिती दिल्याचे पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केले आहे.

हरिद्वारमध्ये रामदेवबाबा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘कोरोनील’ आणि ‘श्वसरी’ औषधांची कोरोनाबाधित रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचे आणि ही औषधे १०० टक्के परिणामकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला. केवळ सात दिवसांत या औषधांमुळे कोरोना पूर्णपणे बरा होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पतंजलीने या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी किती नमुन्यांची तपासणी केली, हे वैद्यकीय प्रयोग कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या रुग्णालयांत हे संशोधन झाले, त्यासाठी संस्थात्मक तत्त्व समितीने परवानगी दिली होती काय, याचा तपशील पतंजलीकडे मागण्यात आल्याचे आयुष मंत्रालयातर्फे सांगण्यात आले होते.

पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी हरिद्वारमध्ये सांगितले की, ५४५ रुपयांना पतंजलीचे कोरोना संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ३० दिवस पुरेल एवढे औषध या कोरोना संचामध्ये असेल. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणूनही या संचाचा वापर करता येऊ शकतो, असा दावाही पतंजलीने केला आहे. या औषधांचे उत्पादन हरिद्वारस्थित दिव्या फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लि. यांनी केले आहे. तर पतंजली संशोधन संस्था आणि जयपूरस्थित राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या संयुक्त संशोधनातून औषध तयार करण्यात आल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले.

कोरोनील, श्वसरी आणि अनू तेल या तीन औषधांचा कोरोना किटमध्ये समावेश आहे. प्रतिकारशक्ती वाढविणारी ही औषधे नाहीत तर कोरोना पूर्णपणे बरा करणारी आहेत. या औषधांचा २८० कोरोनाबाधित रुग्णांवर प्रयोग करण्यात आला. त्यापैकी ६९ टक्के रुग्ण तीन दिवसांत बरे झाले. हे औषध घेतल्यावर सात दिवसांत रुग्ण पूर्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.

दरम्यान पतंजलीच्या या औषधांबाबत केले जाणारे दावे आणि त्यासाठी घेतलेल्या शास्त्रीय चाचण्या यांची कोणतीही माहिती नाही. औषधांची जाहिरात करण्यावर कायद्यानुसार निर्बंध असल्याचे पतंजलीला आयुष मंत्रालयाकडून बजावण्यात आले आहे.

Leave a Comment