चीनची पुन्हा आगळीक; रशियाने भारताला शस्त्रास्त्र विकू नये


नवी दिल्ली – भारत आणि चीन या दोन्ही देशामंध्ये सध्या पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असून त्याच दरम्यान चीनकडून जर का पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात करण्यात येणार आहे.

दरम्यान रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये, असे मत चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या पीपल्स डेलीने व्यक्त केले आहे. या संदर्भात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशियाने या संवेदनशील काळात भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार असल्याचे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिले असून यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

आवश्यक युद्धसाहित्याची रशियाकडून खरेदी करुन भारताचा आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरु असताना ही मागणी चिनी सरकारच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. लडाखमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला तात्काळ ३० फायटर विमाने खरेदी करायची आहेत. यामध्ये मिग २९ आणि सुखोई ३० विमानांचा समावेश असल्याचे पीपील्स डेलीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment