15 जुलैपर्यंत बारावीचा, तर जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता


पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. शिक्षण व्यवस्थेवरही लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासुन जरी सुरु झाले, असले तरी अद्याप शाळा, कॉलेज सुरु झालेल्या नाहीत. त्याचबरोबर मार्च महिन्यात झालेल्या दहावी-बारावीच्या परिक्षांचा निकालही अद्याप लागलेला नाही. त्यामुळे हा निकाल कधी घोषित होणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

याच दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी जुलैच्या मध्यावधीत बारावीचा आणि जुलै अखेर दहावीचा निकाल लागू शकतो, अशा माहिती दिली. शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक पार पडली, त्यावेळी काळे बोलत होत्या.

यंदा मार्चच्या दहावी परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 आणि बारावीसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते, पण दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. पण आता निकाल जाहिर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु असून बारावीचा 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलै अखेरीपर्यंत लागू शकतो, असे सांगितले आहे. या कोरोना काळात परीक्षकांकडून 97 टक्के उत्तरपत्रिका जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु असल्याची माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. महाविद्यालयांचे नोंदणी सत्र 1 जुलैपासून सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली. मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Leave a Comment