नवी दिल्ली : यंदाचा जागतिक योग दिवस हा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने लोकांनी डिडीटल माध्यमातून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने योग दिवस घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ला प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनानिमित्त देशाला संबोधित केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या श्वसन संस्थेवर कोरोना हल्ला करतो. योगाची श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसने श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येकाने प्राणायमाला दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावे. कोरोनाबाधितांना यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते, असेही मोदी म्हणाले.
पुढे मोदी म्हणाले की, जागतिक योग दिन हा एकजुटीचा दिवस आहे. त्याचबरोबर जगाला हा विश्वबंधुतेचा संदेश देणारा दिवस आहे. जो आपल्याला जोडतो, एकत्रित आणतो तो योग असतो. जगभरातील लोकांनी कोरोना संकट काळात My Life-My Yoga या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत ज्या प्रकारे सहभाग दर्शवला आहे, ते दाखवून देते की आपल्याकडे योगाचा उत्साह किकी वाढत आहे. यावेळेसचा योग दिन भावनात्मक योग दिन देखील आहे, आपली कौटुंबिक एकता वाढवण्याचा दिवस आहे.
संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचं ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. करोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात,” असं मोदी म्हणाले.
एक आदर्श व्यक्ती तो आहे, जो नितांत निर्जन स्थितीतही क्रियाशील असतो आणि अत्याधिक वेगवान आयुष्यात देखील पूर्ण शांतीचा अनुभव घेतो असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. ही एक कोणत्याही व्यक्तीसाठी मोठी शक्ती आहे. आपल्या आयुष्यात योगामुळे ऊर्जा मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योगा आहे. योगा सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो, असे देखील पंतप्रधानांनी म्हटले आहे.