काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत १४ हजारांची वाढ


मुंबई – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. त्यातच आता मागील चोवीस तासांमध्ये देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात १४ हजार ५१६ नव्या रुग्णांची भर पडली असून त्याआधी दोन दिवस १२ हजार ८८१ आणि १३ हजार ५८६ रुग्णांची वाढ झाली होती.

देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९५ हजार ४८ झाली असून त्यापैकी २ लाख १३ हजार ८३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ९१२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून हे प्रमाण ५४.१३ टक्कय़ांवर पोहोचले आहे. १ लाख ६८ हजार २६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर देशभरात एकूण १२ हजार ९४८ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच मागील चोवीस तासांमध्ये ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला.

१ लाख ८९ हजार ९६९ एवढ्या सर्वाधिक नमुना चाचण्या चोवीस तासांमध्ये केल्या गेल्या असून बाधितांचे प्रमाण ७.६४ टक्के आहे. आतापर्यंत ६६ लाख १६ हजार ४९६ नमुना चाचण्या झाल्या आहेत. दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ५३ हजार ११६ झाली असून चोवीस तासांमध्ये ३ हजार १३७ रुग्णांची वाढ झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शनिवारी एक हजार १९७ नवे रुग्ण आढळून आल्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली असून, मागील २४ तासांत १३६ मृत्यूंची नोंद झाली. त्यापार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मोठय़ा संख्येने खाटा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

१६ ते १९ जूनदरम्यान मुंबईमध्ये ७५, तर १६ जूनपूर्वी ६१ अशा एकूण १३६ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याचे पालिकेला गेल्या ४८ तासांमध्ये हाती आलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले. या १३६ जणांमध्ये ९४ पुरुष, तर ४२ महिलांचा समावेश होता. तसेच नऊ जण ४० वर्षांखालील, ७६ जण ६० वर्षांवरील, तर ५१ जणांचे वय ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.

आतापर्यंत मुंबईतील मृतांची संख्या तीन हजार ५५९ झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी ८०१ करोना संशयितांना दाखल करण्यात आले. मुंबईत कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या ६१० व्यक्ती शनिवारी बऱ्या झाल्या असून त्यांना रुग्णालयांतून घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत ३२ हजार ८६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.

Leave a Comment