अभिनव कश्यपचा आरोप; बीईंग ह्यूमनच्या नावाखाली होते मनी लाँड्रिंग


सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडचा दंबग खान अर्थात सलमान खान विरोधात सोशल मीडियात रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंगचा दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यपने बिईंग ह्यूमन चॅरिटीच्या नावावर मनी लाँड्रिंग होत असल्याचा आरोप केला आहे. याआधीही त्याने सलमानवर अनेकदा टीका केली आहे. दरम्यान सलमानवर दुसऱ्यांचे करियर संपवणे, नेपोटीझ्म असे अनेक आरोप होत आहेत.

सलमानची बीईंग ह्यूमन चॅरिटी हा एक दिखावा असून सलीम साहेबांची बीईंग ह्यूमन ही सर्वात मोठी आयडिया आहे. त्यातील चॅरिटी हा एक दिखावा असून माझ्या डोळ्यासमोर दबंगच्या शूटिंग दरम्यान पाच सायकल वाटल्या जायच्या आणि दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांमध्ये दानशूर सलमानने पाचशे सायकल दिल्याच्या बातम्या यायच्या. मीडियासमोर, सलमानच्या गुंड मवाली प्रतिमेला न्यायालयीन प्रकरणात सुधारण्यासाठी हे सुरु असल्याचे अभिनवने म्हटले आहे.

अभिनवने सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपल्या प्रभावाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सलमानचे कुटुंब गटबाजी करते. जे सलमानला आवडत नाहीत, त्यांना इंडस्ट्रीत काम मिळणे कठीण असते. त्यांच्या करियरमध्ये अनेक अडचणी येत असल्याचेही त्याने म्हटले होते.

पाचशे रुपयांची जीन्स आज बीईंग ह्यूमनमध्ये ५ हजारांना विकली जाते. चॅरिटीच्या नावावर कोणत्या माध्यमातून मनी लॉंड्रींग सुरु आहे हे सांगता येत नाही. हे पैसे सर्वसाधारण जनतेच्या डोळ्यात धूळ टाकून गोळा केले जात आहेत. कोणाला काही देण्याची यांची प्रवृत्ती नाही. फक्त घेण्याची वृत्ती आहे. बीईंग ह्यूमनची सरकारने चौकशी करायला हवी. यामध्ये मी सहकार्य करेन, असे अभिनवने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment