‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांशी ‘मनोमिलन’, विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार राजू शेट्टी


कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला असून स्वाभिमानी शेतकरी शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला असून आता आमदारकी राजू शेट्टी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी राजू शेट्टी यांच्या बैठकीत दूर करण्यात आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले होते. शेट्टी यांनी यासंदर्भात शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. पण यानंतर संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर फेसबुक पोस्ट करत दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ब्यादच आपल्याला नको, असे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. सोशल मीडियावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडत समोरून झालेले तलवारीचे घाव भरून निघतात, पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. चळवळ संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण आम्ही रक्त सांडून चळवळ उभा केली आहे, कुणाच्या मायावी प्रयत्नाने संपणार नसल्याचे म्हटले होते.

राजू शेट्टी यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर राज्यभरातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आमदारकी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा अध्यक्षा पूजा मोरे यांनी तर रक्ताने पत्र लिहित राजू शेट्टी यांनी विधानपरिषद आमदारकी स्वीकारावी अशी मागणी केली होती. तर काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांनी आमदारकी न स्वीकारल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला होता.

यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत काल राजू शेट्टी यांनी बैठक घेतली. संघटनेत निर्माण झालेला वाद या बैठकीत अखेर मिटला. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला. या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी राजू शेट्टी यांनी दूर केली. काल या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर वादावर पडदा पडला. चळवळीला नख लागेल, असे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचे नाराज झालेल्या दोन्ही नेत्यांनी राजू शेट्टी यांनी बोलून दाखवले होते. चर्चेतून नाव पुढे यावे अशी नाराज नेत्यांची मागणी होती.

Leave a Comment