भारतीय संघाच्या खेळाडूचा निर्धार; यापुढे करणार नाही चायनीज ब्रॅण्डची जाहिरात


मुंबई : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधातील मोहीम आणखी आक्रमक झाली आहे. देशातील नागरिकांकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहनेही नागरिकांच्या या मागणीचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही चायनीज ब्रॅण्डची जाहिरात करणार नसल्याचा निर्णय हरभजनने घेतला आहे.


लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी वाढू लागली आहे. दरम्यान ट्विटरवर सगळ्या चायनीज वस्तूंवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने केली आहे. हरभजनच्या या निर्णयाचे कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT)कौतुक केले आहे. अशाप्रकारे चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालणारा हरभजन हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. पैशांपेक्षा हरभजनने देशाला जास्त महत्त्व दिल्याची प्रतिक्रिया कैटने दिली आहे. कैटने सेलिब्रिटींनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

Leave a Comment