कोरोनाच्या संकटकाळात रेल्वेत 56 हजार जणांना मिळाली नोकरी


मुंबई : देशावर ओढावलेल्या कोरोना सारख्या महामारीमुळे देशातील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. या दरम्यान अनेकांची नोकरी जात असताना व्यापक प्रमाणात रेल्वेने नोकरभर्ती सुरु केली आहे. याची प्रक्रिया देखील सुरु झाली असून असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या तब्बल 56 हजार जागा रेल्वे मंत्रालयाने भरल्या आहेत.

रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या 56378 जागांसाठी भरती झाली. निवडलेल्या उमेदवारांच्या पॅनेलला मान्यता देण्यात आली असून 40420 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात आली. बाकी निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील काही उमेदवारांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे.

31 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान रेल्वे भरती मंडळाने जाहीर केलेल्या 64,371 जागांसाठी संयुक्त भरती जाहीर केली होती. या जागांसाठी एकूण, 47,45,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. तीन टप्प्यात या भरतीसाठी उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. कंम्प्यूटर आधारित परीक्षा त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली गेली. यामधून 56,378 उमेदवारांची निवड केली गेली.

कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय सध्या अडचणीत आले आहेत. परिणामी अनेकांच्या हाताला काम नाही. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक खाजगी आस्थापनांमधील नोकऱ्या देखील गेल्या आहेत. या काळात रेल्वे मंत्रालयाकडून ही मोठी भरती सुरु केल्याने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

Leave a Comment