नवी दिल्ली – बीसीसीआयकडून आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला दिलासा मिळाल्यानंतर आता तो तब्बल सात वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर श्रीसंतबद्दल लोकपाल डी. के. जैन हे निर्णय घेतील असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यानुसार २० ऑगस्ट २०१९ ला श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार ३७ वर्षीय श्रीसंतला केरळच्या रणजी संघात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे.
श्रीसंतचे सात वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर ‘कमबॅक’
केरळ उच्च न्यायालयाने २०१८ साली श्रीसंतवर बीसीसीआयकडून घालण्यात आलेली क्रिकेटबंदी उठवण्याचे आदेश दिल्यानंतर श्रीसंतला या प्रकरणात २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले पण त्याची बंदीची शिक्षा कमी करावी असेही निर्देश दिले. त्यानुसार श्रीसंतवरील बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० पर्यंत निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सप्टेंबरनंतर सुरू होणाऱ्या रणजी हंगामासाठी केरळच्या संघात श्रीसंतला समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.